• विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेकीचा निषेध.
पिंपरी चिंचवड-: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या आणि कथित हल्ल्याच्या घटनेचा संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा अपमान करणाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींवर अशा प्रकारचे हल्ले करणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात पुराव्यानिशी भूमिका मांडत होते. त्याचाच राग मनात धरून ब्राह्मणवादी विचारांचे संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून हा शाई फेकीचा प्रकार घडवण्यात आला आहे.
“महाराष्ट्राची संत परंपरा ही विचारांची आणि सहिष्णुतेची परंपरा आहे. अशा भूमीत मतभेद असतील तर ते लोकशाही मार्गाने मांडले पाहिजेत. मात्र शाईफेक, धमक्या आणि हल्ले करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे,” असे काळे म्हणाले.
यावेळी त्यांनी संग्राम भंडारे यांच्यावर जोरदार टीका करत, “अशी कृत्य करणारे लोक महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करून स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने ओळखले पाहिजे,” असा घणाघात केला.
तसेच संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या महाराष्ट्रात ब्राह्मणवादी आणि दडपशाहीच्या प्रवृत्ती वारंवार डोके वर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “इतिहासातही संत विचार दाबण्याचे प्रयत्न झाले, मात्र सत्य आणि विचारांचा विजयच झाला आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत काळे यांनी सांगितले.
या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. तसेच सामाजिक आणि राजकीय मतभेद हिंसाचाराच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी असे आवाहनही सतिश काळे यांनी केले आहे...

0 Comments