Hot Posts

6/recent/ticker-posts

वेळेआधीच थंडीला रामराम, उन्हाचा चटका वाढला.


      पुणे; दि.१७ (शशिकांत पाटोळे) :  थंडी गायब झाली आहे आणि आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या दोन आठवड्यांत महाराष्ट्राच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.राज्यात जानेवारीत पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती, त्यामुळे कोरडेपणा वाढला आहे.

• कोकणात कसं राहील हवामान?

       उत्तर भारतातून येणारे थंड वारे आता थांबले असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या उबदार वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही आता ‘स्वेटर’ कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला, तरी बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

• या जिल्ह्यांवर पावसाचं संकट..

       दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि कोल्हापूर, सांगली, सातारा पट्ट्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचा शिडकावा होऊ शकतो. स्कायमेटच्या अंदाजानुसार हवामान तज्ज्ञांच्या मते, मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच अनेक जिल्ह्यांत तापमान ३५ ते ३७ अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता यंदा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि खान्देशात उन्हाचा तडाखा जास्त असेल.

• शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..

       शेतीसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे, सध्या मान्सूनवर परिणाम करणारी एल निनो स्थिती आता कमकुवत होत आहे. मार्च-एप्रिलपर्यंत ही स्थिती संपुष्टात येऊन न्यूट्रल होईल, असा अंदाज आहे. जर मे-जूनपर्यंत ला निना स्थिती सक्रिय झाली, तर यंदाचा मान्सून समाधानकारक राहू शकतो. मात्र, यावर पुढील एक महिना बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.

Post a Comment

0 Comments