Hot Posts

6/recent/ticker-posts

अहमदाबाद सोडून मुंबईतच का होऊ शकते टीम इंडियाची विक्ट्री परेड? जाणून घ्या ५ महत्वाची कारणं..

.        पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; १० मार्च २०२६ : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने २०२४ नंतर सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यामुळे टीम इंडियाचा हा विजय अजूनच खास ठरलाय. अहमदाबादमध्ये फायनल सामना झाल्यावर बरंच सेलिब्रेशन सुद्धा झालं मात्र तरीही टीम इंडियाची विजेती परेड ही मुंबईतच आयोजित करण्याचं ठरवलं आहे. मात्र अहमदाबाद सोडून मुंबईतच ही परेड का आयोजित याविषयी जाणून घेऊयात. 

• बीसीसीआयचं मुख्यालय मुंबईत :

      बीसीसीआयचे मुख्यालय मुंबईत वानखेडे स्टेडियमजवळ आहे. सर्व नियोजन, सुरक्षा, परवानग्या आणि खेळाडूंचे समन्वय यासाठी मुंबई हे ठिकाण सोयीचं आहे. अहमदाबादमध्ये फक्त सामना झाला, पण राष्ट्रीय स्तरावरचा 'विजयी स्वागत' कार्यक्रम बीसीसीआय मुंबईतच आयोजित करते.

         • परंपरा आणि इतिहास :

      २००७ मध्ये जेव्हा एम एस धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्ड कप भारताने जिंकला होता तेव्हा पहिल्यांदा मुंबईत मरीन ड्राईव्हवर विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. २०२४ टी-२० वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने जिंकला यावेळी सुद्धा मुंबईत मरीन ड्राईव्हवर विजयी परेड आयोजित करण्यात आली होती आणि मग त्याचा सत्कार समारंभ हा वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. दोन्ही वेळी लाखोंची गर्दी, ट्रॅफिकच नियोजन, देशभर टीव्हीवर लाईव्ह कव्हरेज इत्यादीमुळे बीसीसीआयने हीच परंपरा कायम ठेवली आहे.

• मुंबईची क्रिकेट संस्कृती आणि इन्फ्रास्ट्रक्चर :

       मुंबई क्रिकेटची राजधानी म्हणून ओळखली जाते. मरीन ड्राईव्हसारखी खुली जागा जिथे लाखो लोक एकत्र येऊ शकतात, तसेच येथे सुरक्षा व्यवस्था राखता येते हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. वानखेडे स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार तासेक्सच ट्रॉफी शो करण्याची सोय इथे आहे. अहमदाबादमध्ये मोदी स्टेडियम सामन्यासाठी उत्तम, पण वरील सर्व कारणांमुळे अशा 'ओपन बस परेड' साठी मुंबईच योग्य ठरते. 

• खेळाडू आणि व्यवस्थापनाची सोय :

        टीम इंडियाचे खेळाडू फायनल जिंकल्यावर अहमदाबादहून बॅचमध्ये निघाले आहेत. यातील काही दिल्लीला तर काही मुंबईला रवाना झालेत. IPL च्या तयारीसाठी वेळ कमी आहे. मुंबईत एकत्र येणे हे खेळाडूंसाठी सोपे आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, यांसारखे अनेक स्टार खेळाडू हे मुंबईतच राहतात. 

• अहमदाबादमध्ये का नाही?

        अहमदाबादमध्ये फायनल झाल्यामुळे यापूर्वीच तेथे प्रचंड सेलिब्रेशन झालं आहे. आता दुसरी परेड तेथे करण्याची गरज नाही.  अहमदाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खुल्या रस्त्यांवर विजयी परेड शक्य नाही, तसेच आयोजन करताना व्यवस्थेची तारांबळ उडू शकते. अहमदाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रण मुंबई इतके सोपे नाही. 

       बीसीसीआयला राष्ट्रीय एकात्मता दाखवायची असते म्हणून मुंबई देशाची आर्थिक आणि क्रिकेट राजधानी असल्याने येथे टीम इंडियाची विजयी परेड पार पडणार आहे. 

          मरीन ड्राईव्हवर ओपन बस परेड होईल आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये सत्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे याची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार १२ ते १५ मार्च या कालावधीत विजयी परेड मुंबईतच आयोजित केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments